__________________________________

Friday

निसर्ग सांगतोय...पण आपण ऐकणार का? (भाग ३)




...उत्तराखंड पाऊसकांडाने आणखी काही गोष्टी अधोरेखित केल्या.

एक म्हणजे, भारतीय लष्कर, त्यांचे जवान, त्यांची साधनसामग्री, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा एकूणच विचार करण्याची पद्धत ही कौतुक करावी तितकी कमी आहे. भारताची ही एक संस्था अशी आहे, की जिचा भरोसा केला जाऊ शकतो, मग प्रसंग कसलाही असो.. लष्कर आहे म्हटले की चिंता नाही. केवळ १०-१२ दिवसांत या लोकांनी ६०,००० ते ७०,००० यात्रेकरूंची सुटका केली. आणि तीसुद्धा प्रतिकूल हवामानात.. केवढे व्यवस्थापन, केवढी संघशक्ती, केवढी ऊर्जा.. वा!

Courtesy:IAF Handout


दुसरे म्हणजे, "सरकारी" हा शब्द आता अधिकृतरित्या ’शिवी’ म्हणून वापरायला हरकत नाही... जे जे काही सरकारी म्हणून या आपत्तीत किंवा आपत्तीनिवारणात होते, ते सर्व अत्यंत खराब दर्जाचे, कमालीच्या असंवेदनशीलतेचे किंवा निव्वळ दिङ्मूढ अवस्थेचे होते. म्हणजे, सुरूवातीला जेव्हा लष्कर आले नव्हते त्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवसांत, प्रशासन नावाची चीज त्या प्रलयातच वाहून गेल्यासारखी नष्ट झाली होती.. जिकडेतिकडे नुसता गोंधळ... कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही! कोण कुठे आहे, किती अडकलेत, किती जिवंत आहेत.. त्यांच्या सुटकेसाठी प्राथमिक प्रयत्न काय करायला हवेत, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था काय इ. इ. असंख्य प्रश्न नुसते थैमान घालत होते आणि एकाचेही उत्तर प्रशासनाकडे नव्हते... वास्तविक, तिथले स्थानिक प्रशासक हे त्या परिसराचे सर्वाधिक जाणकार.. त्यांना माहिती हवे की अशा आपत्तीत काय करावे, कुठे जावे वगैरे. परंतु, ते लोकच इतके सैरभैर झाले की, त्यांनाच आधाराची गरज होती... मी म्हणतो, चला जाऊ द्यात... सुरूवातीच्या शॉकमध्ये होतेही असे.. पण नंतर??? एकदा लष्कर आले म्हणले की आपण किमान supporting role मध्ये तरी रहावे... ते नाही... अगदी आजसुद्धा, जे दुर्दैवी जीव तिथे प्राणास मुकले, त्यांच्या सडलेल्या प्रेतांमुळे रोगराई पसरू नये, म्हणून लष्करालाच प्रयत्न करावे लागत आहेत.. अगदी निर्जंतुकीकरणाच्या पावडरपासून ते मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांपर्यंत... ही सरकारी अनास्थेची कमाल आहे.

नवीनच एक गोष्ट समजली ती म्हणजे, आपल्याकडे सर्व राज्यांचे आणि केंद्रातसुद्धा "आपत्कालीन व्यवस्थापन" या नावाने एक स्वतंत्र मंत्रालय (खाते) आहे... वा!!! मला प्रश्न पडलाय की, हे मंत्री, त्यांच्या हाताखालचे सगळे संत्री, अधिकारी, कारकून, शिपाई इ. मंडळी यांचे नक्की काम काय? म्हणजे कागदावर तरी या लोकांची Duty काय लिहिली आहे? आपत्ती येऊ नये म्हणून प्रयत्न करणे का आपत्ती आल्यावर कमीत कमी वेळेत मदत यंत्रणा उभी करणे? का कमीतकमी जीवितहानी व वित्तहानी होईल याची काळजी घेणे??? मग पुढचा प्रश्न येतो, यातील नक्की कोणती गोष्ट हे लोक करतात? प्रत्येक राज्यात शे-दोनशे कोटी खर्च करून चालवलेली ही आस्थापना नक्की काम काय करते? आणि कसे? का हे नुसतेच "खातेपिते" खाते असते???

(दोनशे कोटी = २००,००,००,०००.०० चेष्टा आहे का?...अर्थात, हे प्रश्न कमीअधिक प्रमाणात प्रत्येक मंत्रालयालाच लागू होतात. पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे)

आणखी एक ठळकपणे दिसलेली गोष्ट म्हणजे, तीर्थक्षेत्राच्या आणि पर्यटनाच्या ठिकाणी असलेल्या तसेच एकूणच जनतेची ढासळलेली नीतीमूल्ये. पिढ्यानपिढ्या आपण असे शिकत आलो की अडीअडचणीत असलेल्याची नेहमी मदत करावी... आपल्याकडे आलेला पाहुणा हा देवासमान असतो... कोणत्याही व्यवसायाचा मुख्य आधार म्हणजे त्याचा ग्राहक... इ. परंतु, या आपत्तीमध्ये दिसलेली स्थानिकांची लुटारूवृत्ती, दुसऱ्याच्या अडचणीचा घेतलेला गैरफायदा.. वर हे कमी का काय म्हणून मृतांच्या अंगावरचे दागदागिने पळविण्याचेही प्रकार घडले.. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्यातलाच हा प्रकार नव्हे काय? अमानुषतेची इतकी हीन पातळी आपण गाठलीय? मला खरंच विश्वास ठेवावासा वाटत नाही.. 

असो.. या एका प्रसंगाने अनेकांना अनेक प्रकारचे धडे मिळाले... कदाचित या सगळ्याचा कदाचित चांगला परिणाम होईलही.. लोक बदलतील.. निसर्गाचा आदर करतील.. एवढीच एक अपेक्षा मी व्यक्त करू शकतो.. याहून अधिक काय बोलू अन्‌ काय लिहू?

...धन्यवाद आणि ॐ नमः शिवाय।

(समाप्त)

2 comments:

  1. काळाबरोबर आपण तांत्रिकदृष्ट्या अधिकाधिक प्रगत होतोय आणि नैतिकदृष्ट्या मात्र मागासलेले होत चाललोय. निसर्ग असो वा समाज असो… आपण आपली त्याप्रती असणारी जबाबदारी विसरलोय आणि अधिकाधिक आत्मकेंद्रित बनत चाललोय. या प्रकारच्या दुर्दैवी घटना आपल्या अधपतनाला कदाचित अधोरेखित करत असतील… कदाचित निसर्ग आपल्या भाषेत आपल्याला समजावून सांगत असेल… शिक्षा देत असेल. 
    ह्या वैचारिक लेखाबद्दल आभार!

    ReplyDelete
  2. Perfect analysis of this unfortunate incidence. Ultimately it comes down to knowing our responsibility.. be it towards nature.. or be it towards other people. Thanks for this thoughtful article.

    ReplyDelete