__________________________________

Thursday

....महाराष्ट्र निवडणूक प्रा. लि. (उर्वरीत भाग)

(दुसर्‍या दिवशी...सायब्या येतो...आता भाऊंना सगळे समजले असल्याने, हा निवांत...)
"नमस्कार भाऊ....येऊ का??"

"ये रे...आज काय बातमी?"

"कसली बातमी भाऊ....तुमी बोला, काई ईचार झाला का?"

(भाऊ मिस्किलपणे....)
"कसला ईचार?" (..त्यांच्या डोक्यात पक्का प्लॅन आहे)

"आवो भाऊ...असं काय करता राव...काल समदं म्हाभारत सांगितलं न्हाई का?"

"मंग, तू काय न्हाई का ईचार केला? का आपलं वझं टाकलं भाऊकडं आन्‌ आपन मोकळे....काय? खरं का नाय?"

"आवो भाऊ...असं का बोलाय लागले तुमी... आता काल तुमीच तर म्हनला की त्वांड काळं कर हितनं म्हनून..."

"आरं त्वांड काळं कर म्हनलं, मंजे डोस्कं गहाण टाक आन्‌ कसला विचारबी करू नगं असा अर्थ व्हतो का??"

"आवो भाऊ, येवडी आक्कल आसती...तर...." (थांबतो..), "...आनी काय पायजे व्हतं तवा...मंग कालच्यालाच कायतरी जुगाड नस्तं का केलं म्या..."

(भाऊ हसतात...)
"ते बी खरंच म्हना..."

(भाऊ हसतात तसे सायब्या ओळखतो की काम फत्ते झालं आहे....तोही थोडा हसतो, अजिजीने)
"ओ भाऊ....आता सांगा की राव, काय तुमी पन आमची मस्करी कराय लागले आता..."

"सायब्या...आता सांगतो ते करा..."

"हा भाऊ, तुमी बोला फकस्त....काम झालं म्हनून समजा..."

"आपण काय बॅनर, पोस्टर लावली हायेत का?"

"छापून तयार हायेत भाऊ....आज राती सगळी डकवायचीत..."

"सगळीच्या सगळी...नीट ऐक, सगळीच्या सगळी, नास करून टाका...कायबी शिल्लक ठीवू नका..."

(सायब्या उडतो...)
"काय???? भाऊ हे काय सांगताय? आवो आपन निवडनुकीचं बोलतोय राव....तुमी तर बॉडीचं सांगताय.."
(बॉडी - एखाद्याला उचलून गायब करणे इ कामात वापरला जाणारा भाऊंचा नेहमीचा शब्द)

(भाऊ डोळे वटारतात...)

"ए मुडद्या, त्वांड बंद ठेव आन्‌ मी काय सांगतोय ऐक... मी आता निवृत्तीची घोषणा करणार हाये...त्याची तयारी करा...."

(सायब्या आता फक्त रडायचा बाकी आहे.....तो भाऊंना खोटा धीर द्यायचा प्रयत्न करतो.)

"आवो भाऊ...आसं नगा करू, इतकं मनाला कशापायी लावून घेताय? तुमी आसं केलं तर आमी कुनाकडं बघायचं?? आमी कुटं जायाचं??? आता आमचं कसं व्हनार??"

"ए भXXX, रडतो कशाला रे....मी हाये जिता अजून हितं.."

"मंग काय करायचं? तुमी तर बॉम टाकला आमच्यावर...."

"गप ऐक....नवीन पोस्टर छापा..."

"कसली??"

"आपल्या थोरल्या दादांच्या नावाची...." (भाऊंचे चिरंजीव..), "...आपन यंदा त्याना उभं करू...समद्या कार्यकर्त्यांना सांगा...नको, हितं बंगल्यात मिटींग करा, म्याच सांगीन....त्यांच्या नावावर कायबी रेकॉर्ड न्हाई...लोकांना सांगू की आपन नवीन आन्‌ तरून रक्ताला संधी देत आहोत...त्यांचा जनसंपर्क मोठा नाई....तवा यंदा दुप्पट प्रचार करा...पायजेल तर बॉलीवूड्मदून हिरोईनी बोलवा...काय वाटेल ते करा...लोकं जमा झाली पायजेत....समजलं का? आनी या सगळ्या कामाला तुमचं पोरगं लावा, त्यालाबी यिवू दे रिंगनात....."

(सायब्याला सगळं लक्षात येते...त्याचा चेहरा उजळतो...आवाजात उत्साह)
"आयला....हे ध्यानातच न्हाई आलं माज्या.....एक नंबर आयडीया हाये भाऊ...बास. पन येकच अडचन हाये, बोलू का?"

"आता काय??"

"त्या वस्तीवाल्या नेत्याचं काय करायचं? बॉडी करू का त्याची??"

"अरे अकलेच्या कांद्या, खूळ लागलं का रं तुला? मला बर्बाद करायचं ठरिवलं का तू?"

"आवो पन, त्याचं करायच काय?"

"त्याला जाऊन सांगा, हा मतदारसंघ काय तुझ्या बापाची जागीर न्हाई म्हनावं...."

(उरलेले वाक्य सायब्या स्वतःच म्हणतो)
"....आमच्या दादांच्या बापाची हाये!!!"

(भाऊ आणि सायब्या मोठ्याने हसतात व एकमेकांना टाळ्या देतात.)

(...आणि अशा रीतीने भाऊंचा आणि सायब्याचासुद्‍धा कारभार चालू राहतो)
(समाप्त)

☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺
Sponsored by : The Money Tree
☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻

Wednesday

महाराष्ट्र निवडणूक प्रा. लि.

(लवकरच महाराष्ट्रात निवडणूका होऊ घातल्या आहेत...राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांची धावपळ चालू आहे...त्याचाच एक भाग आम्ही इथे प्रसृत करत आहोत.)

(’माननीय’ भाऊ सकाळी सकाळी पेपर वाचत असताना, ’सायब्या’ हा त्यांचा ’उजवा हात’ येतो....चेहरा पडलेला)
"नमस्कार भाऊ....येऊ का?"

"कोन रं??...आरं सायब्या का? ये की...आन्‌ आसं खेटरानं मारल्यागत का त्वांड झालय?"

(...आत येतो)

"भाऊ...आपल्या मतदारसंघात यंदा काय खरं न्हाई...."

"का? काय झालं??"

"लई वाईट परस्थिती हाये...लोकं लई प्रश्न करत्यात...कायबी इसरलेली न्हाईत."

"कसले प्रश्न? ...आन्‌ काय इसरायचं व्हतं??"

"आवो...आपन गेल्या निवडनुकीत...हाऽऽ येवढा जाहीर्नामा केल्ता...इरोधी उमेदवाराची आय-भैन काड्लीती...हाय का ध्यानात...?"

"....हाये तर...लई मज्जा आली व्हती....त्यामुळंच तर सलग ६ व्यांदा जिकलो न्हाई का?...पन आता काय हाय त्याचं?"

"हा....त्येच तर...लोकं म्हनत्यात, की काय फायदा तुमाला निवडल्याचा? काय केलं तुमी पाच वर्षात...आता आमी मत देनार न्हाई..."

"मत देनार न्हाई म्हंजे?"

"...तुमाला मत देनार न्हाईत."

"मग कुनाला देनार....त्या लाल्तोंड्या कावळ्याला का?"

"आवो भाऊ...आता निवड्नुकीत तरी जपून बोला की राव...आसं नवख्या मानसागत का करताय? आता भिंतिलाबी कान फुटत्यात..."

"आरं येवढ टेंनसन कशापायी घेतो? आपली काय मान्सं न्हाईत का, पैका न्हाई का...आपन न्हेमी काय करतो, ठावं नाई का तुला? चार दिवस आधी सगळ्या वस्त्या फिरा...लाल गांधी (रू १०००) वाटा...दारू पाजा...सगळी मोकळीक हाये की तुमाला...जेंना प्रश्न पडत्यात...ते येत न्हाईत मतदानाला...आपला मतदार बंगल्यात किंवा फलॅटमदी न्हाई राहात...झोपड्या अन्‌ वस्त्यांतून र्‍हातो...त्याचा म्हंजे हिशोब दोन दिवसाची दारू अन्‌ येक नोट...फिनिस. आता ह्ये सगळं का उगळवतोय माझ्याकडून?"

"आवो भाऊ....त्येच तर लफडं हाये ना? ...आता काय सांगाव तुमाला?"

(भाऊंचा चेहरा जरा चिंतेचा...प्रॉब्लेम मोठा असावा अशा समजुतीने)
"..कसलं लफडं??"

"..आवो, पाच वर्ष तुमी निस्ती जिवाची म्हमई केली...हितं काय चाललय, ठावं हाये का?"

(भाऊ भडकतात...)
" ए भाड्या, आता बोलतो का घालू तुला? तुझ्या आXX, तुला काय त्या कावळ्यानं धाड्लं का रं ?? गप मुद्‌द्याचं बोल...मी काय केलं तेचा पाढा नगं वाचू.."

(सायब्या जरा वरमून....)
"आवो भाऊ...पाच वर्सात वस्त्या समद्या बदलल्यात...समदी भायेरची मान्सं भरलीयात..."

"आन्‌ मग आपली मान्स कुटं गेली???"

"ती तर कुटं आपली व्हती....ही आल्यावर ती उलथली कुटंतरी..."

"आन्‌ मंग तुमी काय चिंचोके खेळत व्हता व्हय रं ?? पकापका बोलायला बरं जमतय..." (...अजून मघाचा राग शांत झालेला नाही) "....बर ते र्‍हायलं...आता ह्यांना द्या की आपलं मटेरीयल...ही देतील मतं आपल्याला..."

"...न्हाई भाऊ. ह्येंचा नेता येगळा हाय? आन्‌ तो पन आपन जे करतोय...तेच करतोय...वर तो पडला त्यांचा गाववाला..जातवाला. त्यामुळं सगळं पब्लिक तेच्या बाजूनं हाय...त्यानं पाच वर्सात भारी सेटींग केलीया...राशन्कार्ड, मतदार ओळखपत्र, सगळं मिळवून दिलं ना त्यानं ह्या लोकांना..."

"...तुमच्या माXX, तुमी का न्हाई केलं हे सगळं....निस्ते कुxxx हात हापटत का बसलात? आन्‌ आता कसं समजलं अचानक???

(सायब्या पहिला प्रश्न टाळून....खालमानेनं)
"आता प्रचाराला फिरायला सुरू केलं न्‌ मंग कळलं..."

"म्हंजे भोसXX, तुमीपन साले हित मजा करत बसला...मला शिकिव्तोय हXXXX..."

"भाऊ...आता काय करायचं???"

(एकंदर परिस्थिती भाऊंच्या लक्षात येते...)
"म्हंजे...पयले तुमी वस्त्यांतून फिरलात...तिथं कुत्र इचारत न्हाई म्हणल्यावर बोंबलत सोसायट्यांत गेला...तरी म्हणलं याला कोण प्रश्न इचारतंय?"

(सायब्याचं अवसान संपते...)
"भाऊ आवो आता खरंच कायबी खरं न्हाई..."

(भाऊ विचारात पड्तात...त्यांनाही संकटाची चाहूल लागते)
"एक काम कर...आता तोंड काळं कर हितनं.....ये उद्याच्याला...मी जरा इचार करतो यावर...तुमची राड निस्तरायला पायजेलच की आता...."

(सायब्या जातो.....)
_________________________________
उर्वरीत संवाद आणि भाऊंचे सोल्युशन उद्याच्या लेखात.
-----------------------------------------------


☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺☺
हा ब्लॉग The Money Tree" यांनी प्रायोजित केलेला आहे.
☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻☻

Sunday

भूल पाडणारा "भुलेश्वर"



पुण्यापासून साधारण ५० किमी अंतरावर "भुलेश्वर" हे शंकराचे जागृत देवस्थान आहे. दोन ऑक्टोबरला सुटीचे निमित्त साधून आम्ही मित्र मंडळी तिथे जाऊन आलो. मी बराच आधीही तिथे गेलो होतो. हा योग मात्र खूप काळाने जुळून आला.
भुलेश्वरची वैशिष्ट्ये दोन: पहिले असे की, हे मंदिर अतिशय पुरातन आहे. स्थानिक लोक सांगतात की मूळ मंदिर सुमारे ८५० वर्षांपूर्वीचे आहे...म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्याही आधीचे. बहुधा यादव किंवा सातवाहनकालीन असावे. मंदिर पाहिल्यावर त्याचे प्रत्यंतर येतेच. आणि दुसरे वैशिष्ट्य असे की इथला देव आपल्या ‘जागृता’वस्थेची जाणीव, भक्तांचे प्रसादाचे पेढे खाऊन, करून देतो. हा भाग थोडा श्रद्धा आणि विश्वासाचा आहे.





हे मंदिर एका उंचशा टेकडीवर बांधलेले आहे. मूळ बांधकाम एका किल्ल्याचे आहे. हा किल्ला "मंगळगड" या नावाने ओळखला जाई. त्याचे फुटके बुरुज आणि इतर काही अवशेष अजून शिल्लक आहेत. गडाच्या मध्यभागी मंदिर आहे. गाडी चालवायला अतिशय कठीण अशा घाटातून आपण तिथे पोचतो. वर जात असतानाच आपल्याला मंदिर दिसत असते आणि त्याच्या सौंदर्याची कल्पना येते.

मंदिराची अप्रतिम कलाकुसर आणि त्यावर मोगल राजवटीत झालेले अत्याचार ह्या गोष्टी तिथून आल्यावरदेखील विसरता येत नाहीत. हे ठिकाण मात्र एकदातरी अवश्य भेट देण्याजोगे आहे.

जाण्यासाठी पुणे-सोलापूर हायवेवरून (NH-6) सोलापूरकडे जाताना साधारण ४०-४२ किमीवर उजव्या हाताला भुलेश्वर फाटा आहे. इथून आत वळल्यावर १२ किमी रस्ता आहे. हा रस्ता मध्यम अवस्थेत आहे.

तसेच पुणे-नीरा मार्गावर सासवड लागते. सासवड बस स्टँडच्या पुढे लगेच माळशिरस-बेलसर-भुलेश्वर फाटा आहे. इथून साधारण २२-२५ किमी अंतर कापावे लागते. हा रस्ताही मध्यमच आहे.

दोन्ही मार्ग व खुद्‍द भुलेश्वर हे गर्दीपासून लांब आहेत. जेवण व निवास याची सोय भुलेश्वरला नाही. त्यासाठी सासवड किंवा यवत येथे यावे लागते. पुण्याहून १ दिवसात जाऊन परतता येते. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा काळ प्रवासास उत्तम आहे.


--प्रायोजक--
The Money Tree
----------

मैत्रीदिनाच्या निमित्ताने...

आज "World Friendship Day"...आपल्या भाषेत, ’मैत्रीदिन’. पाश्चिमात्य लोकांचे एक चांगले असते, ते कुठल्याही गोष्टीचे ’साजरीकरण’ करतात. (celebration ला आणखी चांगला शब्द आहे का?) आपल्याकडेही या गोष्टी आजकाल लगेच उचलल्या जातात. आता ही उचलेगिरी चांगली का वाईट वगैरे चर्चा आपण नको करायला. त्यासाठी ’तज्ञ’ नावाची एक विशेष वल्ली असते. इच्छुकांनी कुठलेही न्यूज चॅनेल लावून पहावे. असो..
आपण, त्यातल्यात्यात शहराकडची माणसे, या सर्व गोष्टींचा एक भाग बनून जातो, कळत अथवा नकळत...
आज सकाळपासून माझ्या मोबाईलला सवड नाही. दर १०-१५ मिनिटांनी माझ्या कुठल्यातरी ’फ्रेंडाला’ माझी आठवण होते आणि माझ्या Inbox मध्ये ती जमा होते आहे...चांगले आहे. आपण इतरांच्या स्मरणात आहोत, दखलपात्र आहोत, आपल्यासाठी लोक मेसेज Forward तरी करतात, त्यांच्या Distribution lists मध्ये आपण आहोत, इ. इ. गोष्टी सुखावणार्‍या तर नक्कीच आहेत, नाही का?
मीपण आज ठरवले की बुवा आजचा दिवस आजच्या कारणासाठी वापरावा. संध्याकाळी थोडा वेळ काढून ३-४ मित्रांचे नंबर शोधले. हे सगळे असे आहेत की गेले कित्येक महीने त्यांच्याशी बोललो नव्हतो. मात्र, मध्यंतरी मी माझा मोबाईल बदलला, त्याआधी MSP पण बदलला होता, पण या सर्व transitions मध्ये या मित्रांचे नंबर import करायला विसरलो नव्हतो. (आताशा खरी मैत्री मोबाईल मध्ये carry forward झाली तरच खरी मानतात...)
तर, या मित्रांना फोन केले. बोललो थोडेफार...सुरूवातीला सगळेच formal formal झाले. पण नेटाने संभाषण रेटल्यावर मात्र खरी मजा आली. अक्षरशः काय बोलू आणि काय नको असे झाले होते. न चुकता प्रत्येकाने, "यार, एकदा जमूत यार..." या वाक्य उच्चारलेच.
आता १५ ऑगस्टचा प्लॅन बनतो आहे...पाहूत काय होते ते. मैत्रीदिनाचा एवढा उपयोग झाला तर आणखी काय हवे??